प्रतिनिधी | देवळी |
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान मोहिमेअंतर्गत मौजा चोंढी येथे दि. १५ मे २०२६ रोजी निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
या कार्यक्रमात संजीवनी गटातील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व, रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम तसेच नैसर्गिक उपाययोजनांद्वारे पीक संरक्षण करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
दशपर्णी अर्क आणि निंबोळी अर्क यांच्या वापरामुळे पिकांवरील किडींचे प्रभावी नियंत्रण करता येते, उत्पादन खर्चात बचत होते तसेच जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी सहायक कृषी अधिकारी वंदना खैरकार यांनी सेंद्रिय निविष्ठांच्या वापरावर भर देत मार्गदर्शन केले. समूह सहाय्यक राधिका अडसोड आणि कृषी ताई सारिका थूल यांनी संजीवनी गटाच्या सदस्यांना एकत्र करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले.
कडुनिंब, सीताफळ, करंज, निर्गुडी, पपई, रुई, घाणेरी, टणटणी, एरंड आणि गुळवेल या दहा वनस्पतींच्या पानांपासून दशपर्णी अर्क तयार करून दाखविण्यात आला.
आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय आणि हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले.









