लातूर | प्रतिनिधी
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने बुधवार, २० मे २०२६ रोजी देशव्यापी बंदची हाक दिली असून, या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील रुग्ण आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने खबरदारीचे आवाहन केले आहे.
लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पत्रान्वये या संपामध्ये संघटनेच्या सभासदांनी सहभागी होऊ नये, अशी विनंती प्रशासनामार्फत १४ मे २०२६ रोजी करण्यात आली होती. तरीदेखील संभाव्य अडचणी लक्षात घेता नियमित औषधोपचार सुरू असलेल्या रुग्णांनी आपली आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवावीत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे) ब. दा. मरेवाड यांनी केले आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार तसेच इतर दीर्घकालीन आजारांवरील उपचार घेणाऱ्या रुग्णांनी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधसाठा आधीच उपलब्ध करून घ्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बंदच्या काळात एखाद्या गरजू रुग्णाला अत्यावश्यक औषधे उपलब्ध न झाल्यास किंवा तातडीची अडचण निर्माण झाल्यास नागरिकांसाठी मदत क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
संपर्क क्रमांक :
- सहायक आयुक्त (औषधे) ब. दा. मरेवाड – ८२७५१७५२३२
- औषध निरीक्षक श्रीमती स्वा. क. कुपकर – ८८३०८०१८०६
व्यापक जनहित लक्षात घेऊन नागरिकांनी या आवाहनाची दखल घ्यावी आणि संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी वेळेत आवश्यक औषधे उपलब्ध करून घ्यावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







