वैजापूर | प्रतिनिधी
आज सोमवार दि. १८ मे रोजी वैजापूर पंचायत समिती कार्यालयासमोर हिंदवी जनक्रांती सेनेच्या वतीने प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेशांची प्रत जाळून निदर्शने करण्यात आली. हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
यावेळी अजय पाटील साळुंके यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, “शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे प्रश्न तातडीने मार्गी लावले नाहीत, तर लोकप्रतिनिधींच्या कार्यालयांवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच गावबंदीचा निर्णय घेतला जाईल.”
आंदोलनात शासन आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी चंद्रशेखर साळुंके, प्रकाश बापू ठुबे, गणेश तांबे, बाळासाहेब जानराव, संतोष गोरे, मनोज नळे, आकाश गोरे, दिपक साहानखोरे, किशोर मगर, दादाभाऊ तांबे, अर्चना साळुंके आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी व कष्टकरी सहभागी झाले होते.
प्रशासनाच्या वतीने सहाय्यक गटविकास अधिकारी जायभाये, आरेलेख मगर तसेच प्रशासकांच्या वतीने सभापती पती आणि उपसभापती पती बाळा पाटील जाधव यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिले.
आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
- मनरेगा योजनेतील मंजूर विहिरी, शेततळे, गायगोठे, वृक्ष लागवड आदी कामांची कुशल रक्कम तात्काळ लाभार्थींना द्यावी.
- शिऊर गटातील योजनांची चौकशी करताना विकासकामे ठप्प होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
- विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत नवीन विहिरी, शेततळे, रस्ते आणि वृक्ष लागवड कामांना तातडीने मंजुरी द्यावी.
- मुख्यमंत्री बळीराजा शेत/पानंद रस्ते योजनेअंतर्गत शेतरस्ते मंजूर करावेत.
- ग्रामपंचायत व शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक ऑनलाइन हजेरी यंत्रणा सुरू करावी.
- अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठका कमी घेऊन नागरिकांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत.
- ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपलेल्या ठिकाणी प्रशासक नेमून लाभार्थ्यांना थकीत रक्कम द्यावी.
- सर्व शासकीय अधिकारी व पगारी लोकप्रतिनिधींना कायमस्वरूपी अधिकृत मोबाईल क्रमांक देण्यात यावेत.
- कांदा निर्यात सुरू करून कांद्याला प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे.
या आंदोलनामुळे वैजापूर तालुक्यात शेतकरी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले असून प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





