गेवराई | प्रतिनिधी
मौजे सिंदखेड गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून विहिरी आणि हातपंप कोरडे पडल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांचे हाल होत असून, विशेषतः महिलांना दररोज १ ते २ किलोमीटर पायपीट करून डोक्यावर हंडे भरून पाणी आणावे लागत आहे.
गावातील मुख्य विहिरी आणि हातपंप कोरडे पडल्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. पहाटे ४ वाजल्यापासून महिला आणि लहान मुली दूरच्या शेतातील विहिरींवर पाण्यासाठी रांगा लावत आहेत. एका हंडाभर पाण्यासाठी तब्बल दोन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने महिलांची मोठी गैरसोय होत आहे.
पाणीटंचाईचा फटका जनावरांनाही बसत असून पिण्याच्या पाण्याअभावी दूध व्यवसायावर परिणाम होत आहे. गावातील दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले असून स्वयंपाक, धुणीभांडी आणि इतर कामे रखडली आहेत.
गावातील महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त पाण्याचाच विचार करावा लागतो. उन्हाळा संपत आला तरी पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे.”
दरम्यान, ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच सिंदखेड ग्रामपंचायतीने लवकरात लवकर पाणीपुरवठा पूर्ववत करून नागरिकांची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.








