तळोदा प्रतिनिधी
तळोदा-नंदुरबार मार्गावरील हातोडा पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित युवकासह पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून नवविवाहिता गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एमएच ०४ जीजे ०९३० क्रमांकाची स्विफ्ट कार आणि एमएच ३९ एआर ६०४३ क्रमांकाच्या पल्सर दुचाकीमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात नंदुरबार तालुक्यातील बलवंड येथील रहिवासी जयपालसिंग भारतसिंग गिरासे (वय २६) यांचा जागीच मृत्यू झाला.
जयपालसिंग गिरासे यांचे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच मोठ्या उत्साहात लग्न झाले होते. अंकलेश्वर येथे नोकरी करणारे जयपाल हे शांत, होतकरू आणि कुटुंबवत्सल युवक म्हणून परिचित होते. खान्देशातील पारंपरिक ‘आमरस-पूरणपोळी’ निमंत्रणासाठी जयपाल आणि त्यांची पत्नी निकिता गिरासे हे प्रतापपूर येथे नातेवाईकांकडे गेले होते. त्यांच्यासोबत दोंडाईचा येथील साडूचा पाच वर्षीय मुलगा निरजकुमार कल्याणसिंग गिरासे हाही होता. विशेष म्हणजे त्या दिवशीच त्याचा वाढदिवस होता.
पाहुणचार आटोपून बलवंडकडे परतत असताना हातोडा पूल ओलांडल्यानंतर पुढील वळणावर समोरून येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात जयपालसिंग गिरासे यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी निकिता गिरासे गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, उपचारादरम्यान पाच वर्षीय निरजकुमार कल्याणसिंग गिरासे याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या दिवशी घरात वाढदिवसाचा आनंद साजरा होणार होता, त्याच दिवशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र व गुजरात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेला संसार आणि वाढदिवशीच काळाच्या पडद्याआड गेलेले निष्पाप बालपण या दुर्दैवी घटनेमुळे गिरासे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

