वैजापूर प्रतिनिधी
वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा गावातील गट क्रमांक ७१ मधील शेतकरी इस्माईल गुलजार पठाण यांच्या शेतामध्ये बसविण्यात आलेल्या Shakti Pumps कंपनीच्या सोलर पाट्यांना जोरदार वाऱ्याचा फटका बसून ९ पैकी २ पाट्या फुटल्याची घटना मंगळवार दि. १२ मे २०२६ रोजी घडली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सौरऊर्जेवर आधारित शेती व्यवस्था विस्कळीत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात अचानक जोरदार वारे आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. वाऱ्याचा वेग वाढल्याने शेतातील सोलर पाट्यांच्या संरचनेला धक्का बसला. यामध्ये दोन सोलर पाट्या पूर्णपणे फुटल्या असून काही पाट्या हलल्या असल्याचे सांगण्यात आले. तसेच लोखंडी फ्रेम आणि वायरिंगचेही किरकोळ नुकसान झाले आहे.
सदर सोलर यंत्रणा शासनाच्या योजनेअंतर्गत उभारण्यात आली होती. शेतकऱ्याने स्वतःचे आर्थिक योगदान देऊन ही सुविधा उभी केली होती. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. सध्या उन्हाळी हंगामातील शेतीकामे सुरू असताना सौर पंप बंद पडल्याने पिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती संबंधित विभाग आणि कंपनी प्रतिनिधींना देण्यात आली असून नुकसानग्रस्त पाट्यांची पाहणी करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी इस्माईल गुलजार पठाण यांनी केली आहे. ग्रामस्थांनीही घटनास्थळी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली.







