ठाणे | उल्हासनगर प्रतिनिधी :
उल्हासनगर महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा धक्कादायक प्रकार कॅम्प क्रमांक-४ मधील दहा चाळ परिसरात समोर आला आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी बांधलेला सिमेंट काँक्रिटचा रस्ता आता भुयारी गटाराचे पाईप टाकण्यासाठी पुन्हा खोदण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कॅम्प नं-४, दहा चाळ परिसरात काही महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना चिखल, खड्डे आणि खराब रस्त्यांपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, रस्त्याखालून भुयारी गटाराचे पाईप टाकण्याचे काम आधी न केल्याने आता प्रशासनाला अचानक जाग आली असून अवघ्या ९० दिवसांत नव्याने तयार केलेला रस्ता मशीनच्या साहाय्याने उखडण्यात आला आहे.
नियोजनाच्या अभावामुळे निधी वाया
सध्या शहरात ४५० कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेसह एमएमआरडीए, शासन आणि विविध लोकप्रतिनिधींच्या निधीतून मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. मात्र, विभागांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत असून “एक हात काय करतोय हे दुसऱ्या हाताला माहीत नाही” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
रस्ता खोदल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनधारकांना गाड्या मुख्य रस्त्यावर उभ्या कराव्या लागत असून, खोदलेल्या ढिगाऱ्यांमुळे वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना चालणेही कठीण झाले आहे.
नागरिकांचा संताप
शहरात आधीच अनेक ठिकाणी रस्ते खोदून दुरुस्तीची प्रतीक्षा सुरू असताना, नव्याने बांधलेल्या रस्त्यांची अशी अवस्था पाहून नागरिक संतप्त झाले आहेत. महापालिकेचा हा कारभार म्हणजे नियोजनाचा अभाव की टक्केवारीचे राजकारण, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
दोषींवर कारवाईची मागणी
“हा जनतेच्या कष्टाच्या पैशाचा सरळ अपव्यय आहे. रस्ता बांधताना प्रशासनाला गटार योजनेची आठवण झाली नाही का? महासभेत संबंधित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला जाईल आणि दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येईल,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवक विकास खरात यांनी दिली आहे.








