अकोला शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रचंड उष्णतेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाले असून, या गंभीर परिस्थितीकडे सरकार आणि संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विकास आणि दळणवळणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडवण्यात आला आहे. परिणामी शहरात उकाडा, कोरडे वातावरण आणि उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
विशेषतः रोजंदारीवर काम करणारे मजूर, रस्त्यावर काम करणारे कामगार आणि सामान्य नागरिक प्रचंड उन्हामुळे त्रस्त झाले आहेत. “सिमेंटचे रस्ते, उड्डाणपूल आणि काँक्रीटच्या जंगलांमुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. मात्र या विकासाचा स्थानिक जनतेला प्रत्यक्षात कोणताही फायदा होत नाही,” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
शहरात मोठमोठ्या विकासकामांना मंजुरी देताना पर्यावरणाचा विचार का करण्यात आला नाही? वृक्षतोडीनंतर पर्यायी वृक्षारोपण कितपत झाले? उष्णतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडे कोणती ठोस योजना आहे का? असे अनेक प्रश्न आता जनतेतून उपस्थित होत आहेत.
नागरिकांच्या मते, जागतिक स्तरावरही अकोल्यातील वाढत्या तापमानाची दखल घेतली जात असताना स्थानिक प्रशासन आणि शासन मात्र अद्याप शांत आहे. “जनतेच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्न इतका गंभीर असताना सरकारकडे यासाठी वेळ आहे का?” असा थेट सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि उष्णतेवर नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून उष्णतेपासून संरक्षणासाठी शासनाने विशेष कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

