दुघाळा गावातील शेतकरी श्री. दिवाकर पवार यांच्या शेतातील आखाड्याला आज दुपारच्या सुमारास विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत त्यांच्या संसाराची अक्षरशः राखरांगोळी झाली असून संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीत सुमारे ५०० पाळीव कोंबड्या, दूध देणारी जनावरे, शेतीसाठी वापरण्यात येणारे फवारणी पंप, रासायनिक खते, स्प्रिंकलर तसेच इतर शेती उपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. काही क्षणांत अनेक वर्षांच्या कष्टाने उभा केलेला संसार आगीत भस्मसात झाल्याने पवार कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
आधीच अवकाळी पाऊस, निसर्गाचे संकट आणि शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असताना ही दुर्घटना आणखी मोठा आघात ठरली आहे. घटनेनंतर दिवाकर पवार यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून संपूर्ण दुघाळा गाव भावूक झाले असून ग्रामस्थांकडून मदतीची मागणी होत आहे.
स्थानिक नागरिकांनी तालुका प्रशासन, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच पवार कुटुंबाचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी शासनाने आणि समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“गरीब शेतकऱ्याच्या या वेदनेला न्याय द्या,” अशी भावनिक मागणी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.








