पालघर प्रतिनिधी :
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील कोगदे-चंद्रगाव येथे अवतार कुळ परिवार मेळावा २०२६ मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र, गुजरात तसेच दादरा आणि नगर हवेली येथील अवतार कुळ परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते. परिवारातील ऐक्य, सामाजिक-सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि शैक्षणिक प्रगती हा मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मेळाव्याची सुरुवात कुलदेवतेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर कुलदेवतेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषेत डोक्यावर गौरी घेऊन सांबळ नृत्य आणि तारपा नृत्य सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा-नगर हवेली येथील सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कोगदे परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. शांताराम घेगड, गणपत भोये, विजय भुसारा, नारायण घेगड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश भोये, सेवानिवृत्त शासकीय अधिकारी घुटे साहेब यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. परिवारातील सुमारे २८ ते ३० गावांमधील पाचशे ते सातशे नागरिकांनी मेळाव्यात सहभाग नोंदविला.
यावेळी दहावी-बारावी, नीट परीक्षा, नवोदय व एकलव्य शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सरळ सेवा भरतीत निवड झालेले उमेदवार, सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला.
मेळाव्यात परिवाराच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. आदिवासी संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रम, सामूहिक सांबळ आणि तारपा नृत्यामुळे कार्यक्रमाला पारंपरिक रंगत प्राप्त झाली.
मेळाव्याचे अध्यक्षपद सखाराम सोमा अवतार (कापराडा, गुजरात) यांनी भूषविले. सचिव म्हणून गोविंद रामा अवतार (कोगदे), खजिनदार म्हणून यदुनाथ भिवा अवतार (देवगाव), सहसचिव संतोष बाळू अवतार (आळ्यांचीमेट) तर उपाध्यक्ष म्हणून राजाराम गोपाळ अवतार, प्रकाश अवतार आणि राघो रामा अवतार यांनी जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यदुनाथ अवतार यांनी केले. सूत्रसंचालन संतोष अवतार यांनी तर आभार प्रदर्शन आणि निरोप समारंभ कैलास अवतार यांनी पार पाडला. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.










