किनवट प्रतिनिधी :
किनवट-कोठारी (चि.) ते इस्लापूर या राष्ट्रीय महामार्ग १६१ एच्या कामातील प्रचंड अनियमितता आणि निकृष्ट दर्जा अखेर चव्हाट्यावर आला आहे. स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार भीमराव केराम यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांची भेट घेऊन सविस्तर पुराव्यांसह निवेदन सादर केले.
आमदार केराम यांनी मांडलेली वस्तुस्थिती पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंत्यांना तात्काळ कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रधानसांगवीजवळील टोलनाक्याजवळ सुरू असलेले काम त्वरित थांबवण्याचे निर्देश देण्यात आले असून, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित एजन्सी व कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे. तसेच उर्वरित कामांसाठी तातडीने नवीन निविदा काढून दर्जेदार व जलदगतीने काम पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
आमदार भीमराव केराम यांनी पुराव्यांसह कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचत महामार्गाच्या कामातील अनेक त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. नव्याने सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याला ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्याचे त्यांनी सांगितले. निकृष्ट दर्जा आणि खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून नागरिक जखमी झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय साईड पट्ट्यांमध्ये योग्य प्रमाणात मुरूम न टाकणे, करारातील वेळेचे व गुणवत्तेचे निकष पाळले न जाणे, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, आता नव्या निविदेनंतर महामार्गाचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आमदार भीमराव केराम यांच्या आक्रमक पाठपुराव्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या इतर कंत्राटदारांचेही धाबे दणाणले असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.







