अशोक बबन शेंडकर, मुख्याध्यापक – देवी एकवीरा विद्यालय, गोवंडी
देशाची खरी ओळख त्याच्या संविधानातून आणि शिस्तीतून निर्माण होत असते. भारताचे संविधान घडविण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेले अथक परिश्रम हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहेत. संविधानाने दिलेली मूल्ये, कर्तव्ये आणि शिस्त हीच राष्ट्राच्या प्रगतीची खरी ताकद आहे.
या शिस्तीचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे राष्ट्रगीताचा सन्मान. राष्ट्रगीत हे केवळ गाणे नसून, राष्ट्राभिमान, एकता आणि देशप्रेमाची भावना जागृत करणारा पवित्र स्वर आहे. कोणताही शासकीय कार्यक्रम असो, शाळेतील उपक्रम असोत किंवा चित्रपटगृहातील वातावरण — राष्ट्रगीत सुरू होताच प्रत्येकाने सावधान स्थितीत उभे राहून त्याचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे.
शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्याचे मोठे कार्य केले जाते. शाळा भरताना आणि सुटताना राष्ट्रगीत, प्रार्थना किंवा राज्यगीताद्वारे विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे दिले जातात. “सावधान” हा शब्द ऐकताच विद्यार्थी शिस्तीत उभे राहतात, कारण त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच शिस्तीचे संस्कार बिंबवलेले असतात.
मात्र, सध्याच्या काळात शिस्तीचा धाक कमी होत चालल्याचे चित्र दिसून येते. विद्यार्थ्यांना कठोरपणे समज देणेही धोकादायक मानले जाऊ लागल्याने शाळांमधील शिस्त काही प्रमाणात सैलावली आहे. वर्गात शिक्षक उपस्थित असतानाही गोंधळाचे प्रकार वाढताना दिसतात. त्याचा परिणाम राष्ट्रगीतासारख्या गंभीर बाबींवरही होत आहे.
विशेषतः शाळा सुटताना किंवा भरताना काही पालक राष्ट्रगीत सुरू असतानाही मोबाईलवर बोलणे, गप्पा मारणे किंवा शाळेच्या परिसरात विनाकारण फिरताना दिसतात. हे दृश्य विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम करणारे ठरते. मुले मोठ्यांचे अनुकरण करतात आणि त्यामुळे शिस्तीबाबत चुकीचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचतो.
राष्ट्रगीताचा सन्मान करणे हा प्रत्येक नागरिकाचा नैतिक आणि राष्ट्रीय धर्म आहे. त्यामुळे शाळांनी पालकांमध्येही जनजागृती करणे आवश्यक झाले आहे. शाळांच्या प्रवेशद्वारांवर “राष्ट्रगीत सुरू असताना शिस्तीत उभे राहा” असे फलक लावणे, सतत सूचना देणे आणि पालकांना याबाबत संवेदनशील करणे गरजेचे आहे.
जपानसारख्या शिस्तप्रिय देशांमध्ये राष्ट्रगीताचा किती आदर केला जातो याची उदाहरणे जगासमोर आहेत. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ निर्माण झाल्यास राष्ट्रगीत सुरू होताच लोक शांत आणि सावधान होतात. हीच खरी शिस्त आणि संस्कारांची ताकद आहे.
ज्याप्रमाणे आपण राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान करतो, त्याचप्रमाणे राष्ट्रगीत आणि शिस्त यांचाही आदर करणे आवश्यक आहे. शिस्त, राष्ट्रप्रेम आणि जबाबदारीची भावना प्रत्येक नागरिकामध्ये निर्माण झाली तरच देश खऱ्या अर्थाने महान होईल.











