उमरगा | प्रतिनिधी
उमरगा शहरातील माने नगर परिसरात, विशेषतः मूकबधिर शाळेजवळील रस्त्यांची अवस्था पावसाळ्यात अत्यंत बिकट होत असून नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. थोडासा पाऊस झाला तरी रस्त्यावर चिखल, खड्डे आणि पाण्याचे मोठे डबके साचत असल्याने ये-जा करणे कठीण बनले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तब्बल आठ वर्षांपासून या भागातील रस्त्यांची समस्या कायम असून प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय वाढत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांनी अनेकवेळा स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे या समस्येबाबत तक्रारी केल्या. मात्र अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याची नाराजी परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पावसाळा तोंडावर आला असताना नगरपालिका प्रशासन, आमदार, नगराध्यक्ष तसेच संबंधित नगरसेवक या गंभीर समस्येकडे लक्ष देतील का? रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था करतील का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक रहिवाशांनी संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून रस्त्यांचे मजबुतीकरण, खड्डे बुजविणे आणि पाणी निचऱ्याची प्रभावी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.







