मारेगाव | प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील बुरांडा गावात ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून पावसामुळे ठिकठिकाणी चिखल आणि पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गावातील अनेक रस्त्यांवर फरशी किंवा पक्की व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेषतः ताकसांडे यांच्या घरापासून अवताडे यांच्या घरापर्यंतच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आवश्यक ठिकाणी कामे न करता इतरत्र मुरूम व चुरी टाकण्यात येत आहे. ज्या भागात प्रत्यक्षात रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक आहे, त्या ठिकाणी मात्र ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या समस्येमुळे नागरिकांसह शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना दैनंदिन ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होत असून अपघाताचा धोका वाढला असल्याचीही ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती, मुरूम टाकणे तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाने अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
