गोविंदपूर | प्रतिनिधी
शेगाव ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या श्री संत गजानन महाराज पालखीचे कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे यंदाही पारंपरिक उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे. दि. १३ जुलै २०२६ (सोमवार) रोजी सकाळी ११ वाजता सुमारे ७०० वारकरी, अश्व आणि वाहनांच्या ताफ्यासह पालखीचे गोविंदपूर येथे आगमन होणार असून, या निमित्ताने महाप्रसादासाठी शिधा संकलनास प्रारंभ झाला आहे.
गोविंदपूर येथे दरवर्षी पालखीचा दुपारचा मुक्काम होत असल्याने पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांसह दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने धान्य व इतर जीवनावश्यक शिधा संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे.
या सोहळ्यास गोविंदपूरसह बोरगाव (बु.), देवधानोरा, खामसवाडी, माळकरंजा, बोरवंटी, जवळा, एकुरका, नागझरवाडी आणि परिसरातील अनेक गावांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतात. त्यामुळे महाप्रसादाची तयारीही मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.
पालखी सोहळ्याचे नियोजन समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, उपाध्यक्ष मधुकर मिसाळ, खजिनदार वसंत जाधव तसेच सदस्य चंदुलाल मुंडे, विष्णू ढोबळे, तुकाराम सौदागर, कुंडलिक माळी, मधुकर कोळी, सिद्धलिंग बिडवे, बापू बिडवे, बालाजी माळी, सायसराव मुंडे, साहेबराव होनमाने, माऊली मुंडे, अण्णा पाटोळे, रामहरी मुंडे, सुधाकर पांचाळ, हिरालाल मुंडे, लालासाहेब माळी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात येत आहे.
या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन गोविंदपूर पालखी समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
