प्रतिनिधी : (शिरूर, जि. पुणे)
सोनेसांगवी गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गावातील पिण्याचे पाणी सोनार मळ्यातील तळ्यात साठवले जाते. त्यानंतर हे पाणी गावातील विहिरीत सोडून संपूर्ण गावाला पुरवठा केला जातो. मात्र यंदा वाढत्या उन्हामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे.
तसेच तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत मोटारीद्वारे शेतीसाठी पाणी उपसा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यामुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्यावर मोठा परिणाम होत असून, या अनधिकृत मोटारींवर ग्रामपंचायत कधी कारवाई करणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

गावासमोर भविष्यात पाण्याचा अधिक गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी तळ्यातील अनधिकृत मोटारी बंद करून उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दि. 22 मे रोजी गावच्या तलाठी राऊत मॅडम, शिवसेना तालुकाप्रमुख मल्हारीशेठ काळे, ग्रामसेवक चितळकर मॅडम, यात्रा कमिटी अध्यक्ष दत्तात्रय बोऱ्हाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद काळे तसेच उपाध्यक्ष विजय बोऱ्हाडे यांनी तळे व विहिरीची पाहणी केली.
यावेळी गावासाठी तात्काळ टँकर सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली असून, नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.











