चंदगड प्रतिनिधी
कलानंदीगड किल्ला या ऐतिहासिक किल्ल्याला अखेर महाराष्ट्र शासनाने ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून २२ मे २०२६ रोजी यासंदर्भातील अंतिम शासन निर्णय (GR) प्रसिद्ध करण्यात आला. हा निर्णय चंदगड तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानला जात असून, आमदार शिवाजी पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
वनविभागाच्या अखत्यारीत असलेला कलानंदीगड किल्ला पर्यावरणीय आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणून या गडाची ओळख आहे. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन आमदार शिवाजी पाटील यांनी १ जानेवारी २०२६ रोजी राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे लेखी पत्राद्वारे हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत संबंधित विभागाला योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
२२ मे २०२६ रोजी उपसचिव नंदा राऊत यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम अधिसूचनेनुसार कलानंदीगड किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निर्णयाची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच पुरातत्त्व व वस्तू संग्रहालये संचालनालयाच्या संचालकांना किल्ल्याजवळ माहिती फलक उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पारगड किल्ला नंतर आता कलानंदीगडलाही संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्यामुळे शिवप्रेमी आणि चंदगड तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासकीय निधी उपलब्ध होणार असून, ऐतिहासिक वारसा जतन करण्यास मदत होणार आहे. यासोबतच पर्यटनवाढ, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमदार शिवाजी पाटील (भाऊ) तसेच शिवप्रेमींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.










