चंदगड प्रतिनिधी
प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली चंदगड तालुक्यातील विविध शासकीय विभागांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील सहा महिन्यांत प्रभावी कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
या बैठकीला शिवाजीराव पाटील तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान कृषी, महसूल, शिक्षण, आरोग्य, वन विभाग तसेच इतर प्रमुख शासकीय विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांचे रखडलेले यांत्रिकीकरण अनुदान, वन्यप्राण्यांच्या उपद्रवापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेती कुंपण योजना, ग्रामीण भागातील शाळांची दुरुस्ती, घरकुल योजनेतील रखडलेली कामे, आरोग्य विभागातील समस्या तसेच कंत्राटी कामगारांच्या अडचणी या विषयांवर विशेष चर्चा झाली.
चंदगड तालुक्याला भेडसावणाऱ्या वन्यप्राण्यांच्या उपद्रवाबाबतही गंभीर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “चंदगड तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. अधिकाऱ्यांनी केवळ कागदी प्रक्रिया न करता प्रत्यक्ष काम करून पुढील सहा महिन्यांत नागरिकांना दिलासा द्यावा.”
बैठकीला प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भावकु गुरव, पंचायत समिती सदस्य रवींद्र बांदिवडेकर, सौ. सुवर्णा कुंभार, सौ. मनस्विनी कांबळे आणि स्वप्निल इंगवले उपस्थित होते.
तसेच चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील काणेकर, तहसीलदार राजेश चव्हाण, गट विकास अधिकारी वृषाली यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सौमजाळ आणि पोलिस निरीक्षक चौखंडे यांनी प्रशासनाच्या वतीने तालुक्याची माहिती सादर केली.
याशिवाय शांतारामबापू पाटील, दिपक पाटील, चंद्रशेखर पाटील, जयपाल मुन्नोळी, सोमगोंडा आरबोळे, अशोक कदम, संग्रामसिंह अडकुरकर, प्रताप सुर्यवंशी, अंकुश गवस, श्रीशैल नागराळ, बसवराज कंकणवाडी, सौ. भारती जाधव, पत्रकार बांधव, आजी-माजी सैनिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










