लातूर:
बनावट सोने दाखवून फसवणूक करणारी आणि गर्दीच्या ठिकाणाहून पैसे पळविणारी एक अट्टल टोळी लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली आहे. पोलिसांनी या टोळीतील तिघा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ५ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि बनावट सोन्याचे बिस्कीट जप्त केले आहे. या धडक कारवाईमुळे लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या तब्बल आठ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख यांचे पथक तपास करत होते. २२ मे रोजी पोलिसांना बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, औसा-लातूर रोडवरील वासनगाव पाटी परिसरात तीन इसम सोन्याचे बनावट बिस्कीट विकण्यासाठी ग्राहकाच्या प्रतीक्षेत थांबले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकला आणि संशयास्पद रित्या वावरणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे बाबाराव सूर्यकांत जाधव (वय ३०), केशव छगन जाधव (वय ५०) आणि संदीप दगडू जाधव (वय २९, सर्व रा. सलगरा, ता. जि. लातूर) अशी सांगितली. आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे मणीमंगळसूत्र, रोख रक्कम आणि सोनेरी रंगाचे बनावट बिस्कीट आढळून आले. पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी फसवणूक आणि चोरी केल्याची कबुली दिली.
या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत अत्यंत चतुर होती. हे आरोपी महिलांना गाठून त्यांना “सोन्याचे बिस्कीट” स्वस्तात देण्याचा किंवा ते सापडल्याचा बहाणा करायचे आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे खरे मंगळसूत्र चोरून पसार व्हायचे. याशिवाय ही टोळी बसस्थानके, सरकारी रुग्णालय परिसर, गर्दीची ठिकाणे आणि सार्वजनिक कार्यालयांमध्ये नागरिकांच्या खिशातील व पिशवीतील रोख रक्कम चोरण्यातही सक्रिय होती. तपासादरम्यान अटक करण्यात आलेला आरोपी संदीप दगडू जाधव हा उदगीर शहर, औसा, देवणी, शिवाजीनगर आणि चाकूर पोलीस ठाण्यांतर्गत फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये आधीपासूनच पोलिसांना पाहिजे असलेला मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी या कारवाईत आरोपींकडून गांधी चौक, देवणी, अहमदपूर, शिवाजीनगर, कासार शिरसी, औसा, किनगाव आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांतील १ लाख ७३ हजार रुपयांची रोख रक्कम आणि ३ लाख ३० हजार रुपये किमतीचे २२ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी गांधी चौक पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कारवाई प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोउपनि प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार सूर्यकांत कलमे, संजय कांबळे आणि मोहन सुरवसे यांच्या पथकाने केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील फसवणूक व चोरीच्या घटनांना मोठा आळा बसणार असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि सतर्क राहावे, असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे.









