मानवत | प्रतिनिधी
मानवत तालुक्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विविध भागांत वाहतुकीवरही परिणाम झाला.
दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे परभणी मार्गे पाळोदी रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास बाभळीचे मोठे झाड उन्मळून पडले. त्यामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. रस्त्यावर झाड पडल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने झाड हटविण्याचे काम करण्यात आले.
अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.










