कुडाळ | प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्ग वरील झाराप-जांभळी परिसरात शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास Mahindra च्या नवीन इलेक्ट्रिक गाडीचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, निरवडे येथील वेदांत मल्हार यांनी अवघ्या महिनाभरापूर्वी नवीन Mahindra EV खरेदी केली होती. विशेष म्हणजे अपघाताच्या दिवशीच गाडीला अधिकृत नंबर मिळाला होता. ओरोस येथून घरी परतत असताना झाराप येथे आल्यानंतर गाडीचा वेग अचानक वाढल्याचे सांगितले जात आहे.
गाडीचा वेग तब्बल १०७ किलोमीटर प्रतितास झाल्याने चालक वेदांत मल्हार (वय ३०) यांना वाहनावरील नियंत्रण मिळवता आले नाही. भरधाव वेगातील ही इलेक्ट्रिक कार थेट रस्त्यालगत असलेल्या एका गॅरेजमध्ये घुसली.
धडकेचा आवाज इतका भीषण होता की महामार्गालगतच्या घरांपर्यंत तो ऐकू गेला. जोरदार ब्रेकचा आवाज आणि अपघातामुळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून आले.
या अपघातात Mahindra EV च्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या अनेक वाहनांना जोरदार धडक बसून काही वाहने रस्त्यावर फेकली गेली.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये इलेक्ट्रिक गाडीचा वेग अचानक वाढल्याची चर्चा सुरू होती. या घटनेमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.









