कुरुंदवाड | प्रतिनिधी –
पंचगंगा नदी मध्ये सोडल्या जाणाऱ्या रासायनिक दूषित पाण्याच्या प्रश्नावरून शिरोळ तालुक्यातील नागरिकांचा संताप तीव्र झाला असून इचलकरंजी महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित प्रोसेस उद्योगांविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
“पंचगंगा नदीला मृत्यूवाहिनी बनविणारे रासायनिक पाणी कायमचे बंद करा, अन्यथा इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा रोखण्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असा थेट इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमूंगे आणि राकेश जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, गेल्या तीन महिन्यांपासून पंचगंगा नदीत सोडल्या जाणाऱ्या विषारी व रासायनिक पाण्याविरोधात विविध आंदोलने सुरू आहेत. मात्र प्रत्येकवेळी तात्पुरत्या स्वरूपात पाणी बंद करून पुन्हा काळ्या ओढ्यातून प्रदूषित पाणी नदीत सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
“इचलकरंजीच्या औद्योगिक सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीचा जीव घेतला जात आहे. शिरोळ तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे,” असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
माहितीनुसार, प्रोसेस उद्योगांकडे सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक जमीन उपलब्ध नसल्याने जिल्हाधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही निर्बंध लागू केले होते. तरीही अनेक प्रोसेस उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू ठेवून काळ्या ओढ्यातून थेट रासायनिक पाणी पंचगंगेत सोडत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
आंदोलनकर्त्यांनी सात प्रमुख मागण्या मांडल्या असून त्यामध्ये काळा ओढा पूर्णपणे बंद करणे, CETP प्रकल्प तात्काळ बंद करणे, चोरून सुरू असलेल्या प्रोसेस उद्योगांवर कायमस्वरूपी बंदी घालणे, पार्वती आणि लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाची चौकशी करणे तसेच इचलकरंजी महानगरपालिका च्या STP प्रकल्पातील पाणी शेतीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, १ जून २०२६ पासून कुरुंदवाड येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास ३ जूनपासून इचलकरंजीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
“आम्हाला कोणाच्याही पिण्याच्या पाण्यावर गदा आणायची नाही. मात्र आमच्या भागातील नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी आता टोकाचा संघर्ष करावा लागणार आहे,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केली.
यावेळी दीपक पाटील, बंडू बरगाले, प्रभाकर बंडगर, गोपाळ चव्हाण, रशीद मुल्ला, आनंदा भातमारे, संदीप चौगुले, बंटी माळी, सुनील सावंत, भारत ढाले, आयुब पट्टेकरी, प्रकाश बावडेकर, मंगेश नलवडे, विश्वास बालिघाटे, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.









