कुरुंदवाड | प्रतिनिधी
यश अकॅडमी तर्फे विविध क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम कुरुंदवाड येथील भालचंद्र चौकात आयोजित करण्यात आला होता.
यश अकॅडमी मार्फत आजपर्यंत १८३ विद्यार्थी सरकारी सेवेत रुजू झाले असून अनेक जण विविध विभागांत सेवा बजावत आहेत. आर्मी, पोलीस दल, रेल्वे, तलाठी अशा विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध सह्याद्री अकॅडमी चे प्रमुख उमेश रुपनवर प्रमुख उपस्थित होते. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषा डांगे बाहेरगावी असल्याने त्यांचे पती उदय डांगे उपस्थित होते.
यावेळी दादासो पाटील, नगरसेवक जय कडाळे, अक्षय आलासे, रमेश बुजुगडे, शब्बीर बागवान, रणजीत डांगे तसेच सागर माळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींना फेटा आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित मलगुंडे यांनी केले. कार्यक्रमाला सानिका आवाडे यांचीही उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सागर माळी यांनी सांगितले की, “२०१५ साली दहा बाय पंधरा फुटांच्या छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये अकॅडमीची सुरुवात झाली. अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले, मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आज अकॅडमीचे विद्यार्थी देशभरात कार्यरत आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे.”
कार्यक्रमात अनेक यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करत “समाजात, गावात आणि देशात नाव उज्ज्वल करायचे असेल तर मेहनत आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले.
अनेक मान्यवरांनी यश अकॅडमी च्या कार्याचे कौतुक केले.









