आजरा :
पेरणोली (ता. आजरा) येथील आजरा-गारगोटी मार्गावरील मुख्य रस्त्यावर करण्यात आलेली अतिक्रमणे प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हटवली. या कारवाईमुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यावर कमानीजवळ करण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला सातत्याने अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येविरोधात सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव, युवराज लोंढे तसेच ग्रामस्थांनी एकत्र येत प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच आगामी पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, अशीही आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली होती.
ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने तातडीने कारवाई करत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली. या कारवाईनंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली असून ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
कारवाईवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कचरे, कनिष्ठ अभियंता एस. एन. कुंभार, प्रोजेक्ट मॅनेजर कंपनीचे अधिकारी विनय आवसेकर, गणेश मुसळे, तसेच रवींद्र देसाई, पोलीस पाटील सौ. दिपाली कांबळे, उपसरपंच संकेत सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्रभाऊ सावंत, संदीप सासुलकर, पांडुरंग दोरुगडे, डॉ. उल्हास त्रिरत्ने, नामदेव मोहिते, सोपान फगरे, भाऊ भोकरे, काका देसाई, संभाजी कांबळे, आनंदराव कांबळे, नामदेव सावंत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











