परभणी | प्रतिनिधी :
जिंतूर-सेलू मतदारसंघात गेल्या चार दशकांपासून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे ज्येष्ठ नेते विजयरावजी भांबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून परभणी-हिंगोली विधानपरिषदेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्ते व नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या विजयराव भांबळे यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. मतदारसंघातील विविध विकासकामे, जनआंदोलने आणि पक्ष संघटन मजबूत करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.
स्वर्गीय अजितदादा पवार यांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभलेले तसेच माजी मंत्री माणिकराव भांबळे यांच्या राजकीय व सामाजिक वारशाची परंपरा पुढे नेणारे नेतृत्व म्हणून विजयराव भांबळे यांच्याकडे पाहिले जाते. जिंतूर-सेलू परिसरात त्यांचे मजबूत जनसंपर्क जाळे असून सामान्य कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक ही त्यांची मोठी ताकद मानली जाते.
प्रत्येक संकटात कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी परभणी-हिंगोली विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना संधी द्यावी, अशी भावना समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या विजयराव भांबळे यांच्या नावाची चर्चा सध्या जिल्ह्यात चांगलीच रंगू लागली आहे. ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण, पक्षनिष्ठा आणि दीर्घकाळाचा जनसंपर्क यामुळे ते विधानपरिषदेकरिता सक्षम उमेदवार ठरू शकतात, असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून कोणाला संधी दिली जाणार याकडे परभणी व हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले असून “भावी परभणी-हिंगोली विधानपरिषद आमदार” म्हणून विजयराव भांबळे यांच्या नावाची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत आहे.











