प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर.
कुरुंदवाड:- दि.26. शेती पंपासाठी लावलेल्या अतिरिक्त दोन तासांचे भारनियमन रद्द करून दररोज दहा तास नियमित विज पुरवठा करावा या मागणीसाठी आंदोलन अंकुश संघटना व शेतकरी संघटनेने कुरुंदवाड (ता.शिरोळ) येथील वीज वितरण कंपनीवर जोरदार घोषणा देत मोर्चा काढून उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांना निवेदन देऊन ठिय्या आंदोलन केले.
या निवेदनात असे म्हटले आहे की सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून शेतातील पिकांसाठी पाण्याची मागणी वाढलेली आहे. पाण्या अभावी पीके वाळत असताना महावितरण कंपनीकडून काल रात्री 9.30 वा. मोबाईल वर मेसेज आला की,दोन तास अतिरिक्त भारनियमन वाढवण्याचा आदेश काढला आहे. पेट्रोल-डिझेलचे भडकलेले दर, खतांची भरमसाठ दरवाढ जाणि त्यातच आपली ऐन उन्हाळ्यात सुरू झालेली भीषण वीजकपात यामुळे शेतकरी पूर्णपणे ऊध्वस्त होईल. हाता तोंडाला आलेली पिके वाळून जातील. आधीच कर्जाच्या खाईत असलेला शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होणार आहे. त्यामुळे या गोष्टीची दखल घेऊन आपल्या कंपनीकडून अतिरिक्त दोन तासाचा भारनियमनाचा आदेश रद्द करावा तसेच उन्हाळ्यातील पिकाची पाण्याची आवश्यकता (मागणी) लक्षात घेऊन शेती पंपासाठी दररोज दहा तास वीज द्यावी अन्यथा महावितरण आणि शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा देण्यात आला आहे.
हे निवेदन विजयकुमार आडके, कार्यकारी अभियंता जयसिंगपूर व ओमासेसाहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयसिंगपूर आणि दत्तात्रय पांढरे,प्रभारी उप कार्यकारी अभियंता कुरुंदवाड यांनी स्वीकारले व पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच वीज पुरवठा चालू राहील भारनियमन होणार नाही असे आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी आंदोलन अंकुश चे दीपक पाटील म्हणाले की “उद्या जर नेहमीप्रमाणे शेतीपंपाचा वीज पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
यावेळी दीपक पाटील,राजू पाटील, विश्वास बालीघाटे, गोपाळ चव्हाण,रामचंद्र मोहिते (दादा),बंडू उमळवाडे ,सचिन मोहिते,आयुब पट्टेकरी,रविकरण गायकवाड अभिजीत पाटील, अमर पाटील, सुशील पाटील,अतुल मगदूम, दामोदर मगदूम,संदीप गावडेआधी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.











