नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहून अधिकाऱ्यांना फैलावर
“सर्वांची कामे पूर्ण झाल्याशिवाय केंद्र बंद करू नका” – वैभव नाईक
कणकवली | प्रतिनिधी | दि. २६ मे
कणकवली तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात नागरिकांची होत असलेली गैरसोय पाहून कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक चांगलेच आक्रमक झाले. गुजरात इन्फोटेक लिमिटेड कंपनीमार्फत चालविण्यात येणाऱ्या या सेतू सुविधा केंद्रात प्रतिज्ञापत्रे व इतर कागदपत्रांसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यावरून वैभव नाईक यांनी कंपनीचे व्यवस्थापक श्री. पावसकर यांना कडक शब्दांत जाब विचारला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिज्ञापत्रांसाठी केंद्रात केवळ एकच टेबल सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासून नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. अनेक नागरिक विविध गावांतून कणकवली तहसील कार्यालयात आले होते. दुपारी २ वाजता सेतू सुविधा केंद्राचा दरवाजा बंद केला जात असल्याची तक्रार नागरिकांनी वैभव नाईक यांच्याकडे केली.
यावर संतप्त होत वैभव नाईक यांनी, “रांगेत उभ्या असलेल्या सर्व नागरिकांची कामे पूर्ण झाल्याशिवाय सेतू सुविधा केंद्र बंद करायचे नाही,” असा स्पष्ट इशारा व्यवस्थापनाला दिला. तसेच नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
तहसीलदारांवरही नाराजी
नागरिकांची मोठी गर्दी आणि गैरसोय सुरू असताना तहसीलदार मात्र केबिनमध्ये बसून ए.सी.ची हवा घेत असल्याचा आरोप करत वैभव नाईक यांनी प्रशासनावरही नाराजी व्यक्त केली. “नागरिकांना दाखले व प्रतिज्ञापत्रांसाठी चार-चार दिवस हेलपाटे मारावे लागत आहेत. महसूल विभागाने आधी ही परिस्थिती सुधारली पाहिजे,” असे ते म्हणाले.
विशेष म्हणजे, नागरिकांची रांग शौचालयाजवळ लावण्यात आल्याने दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. एवढ्या गंभीर परिस्थितीत अधिकारी मात्र नागरिकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“मी पुन्हा येऊन पाहणी करणार”
यावेळी वैभव नाईक यांनी व्यवस्थापक श्री. पावसकर यांना, “तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या हे पाहण्यासाठी मी पुन्हा दुपारी ३ वाजता येथे येणार आहे,” असेही स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर सेतू सुविधा केंद्रातील कामकाजाला वेग आला आणि उपस्थित नागरिकांची प्रतिज्ञापत्रे व दाखले सायंकाळपर्यंत पूर्ण करून देण्यात आले.
यामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र संपूर्ण गोंधळ आणि गर्दी सुरू असतानाही तहसीलदार शेवटपर्यंत बाहेर न आल्याने नागरिकांनी त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली.
पत्रकारांशी बोलताना वैभव नाईक यांनी सांगितले की, “महसूल विभागाकडून घरपोच सेवा देण्याच्या घोषणा केल्या जातात, पण प्रत्यक्षात नागरिकांना साध्या कामांसाठी अनेक दिवस त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे.”










