महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात अधीक्षक अभियंता कार्यालयाला धडक
वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची अधीक्षक अभियंत्यांची ग्वाही
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात आज सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आक्रमक झाली असून जिल्हाभरातील वीज ग्राहकांनी कुडाळ येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक देत विविध प्रश्नांवर जोरदार जाब विचारला. आंब्रड परिसरातील प्रलंबित वीज समस्या तसेच लिंक लाईनचे काम ३० मेपर्यंत पूर्ण न झाल्यास आंब्रड जिल्हा परिषद मतदारसंघात एकाही वीज अधिकारी-कर्मचाऱ्याला फिरू देणार नाही, असा तीव्र इशारा यावेळी देण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे तसेच जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्राहकांनी अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांची भेट घेत विविध समस्या मांडल्या. यावेळी ग्राहकांच्या मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले.
वीज ग्राहकांनी मांडलेल्या समस्यांमध्ये जीर्ण वीज खांब तात्काळ बदलणे, धोकादायक झाडांची छाटणी करणे, 33KV, 11KV, LT आणि NT लाईनवरील झाडी साफ करणे, आवश्यक ठिकाणी गार्डिंग करणे, कमी-जास्त व्होल्टेजचा प्रश्न सोडविणे तसेच अतिरिक्त क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी करण्यात आली. वारंवार होणाऱ्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे घरगुती उपकरणे, व्यावसायिक साहित्य आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोपही करण्यात आला.
पावसाळा तोंडावर आला असतानाही महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे अपुरी राहिल्याचा आरोप ग्राहकांनी केला. चुकीची वाढीव वीज बिले तपासून कमी करावीत, जेणेकरून ग्राहकांवर अन्याय होणार नाही, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
स्मार्ट मीटरवरून वाद
बैठकीत स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून वातावरण तापले. ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय जुने मीटर बदलले जात असल्याचा आरोप करत वीज ग्राहक संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. वीज कायदा २००३ मधील तरतुदीनुसार ग्राहकांना मीटर निवडीचा अधिकार असल्याचे सांगत जबरदस्तीने स्मार्ट, प्रीपेड किंवा इलेक्ट्रॉनिक मीटर बसविणे थांबवावे, अशी मागणी करण्यात आली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, स्मार्ट मीटरविरोधात यापूर्वी आंदोलने, उपोषणे तसेच लेखी निवेदने देण्यात आली आहेत. हजारो ग्राहकांनी विरोध दर्शवूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला.
“३० मेपर्यंत समस्या सोडवा” – आबा मुंज
आंब्रड जिल्हा परिषद मतदारसंघातील समस्यांवर बोलताना माजी जि.प. सदस्य आबा मुंज यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. ओरोस आणि पणदूर येथील महावितरण अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
“गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या समस्या ३० मेपर्यंत मार्गी लागल्या नाहीत, तर महावितरणच्या एकाही अधिकारी-कर्मचाऱ्याला मतदारसंघात फिरू देणार नाही. गरज पडल्यास त्यांना बांधून ठेवू,” असा संतप्त इशारा आबा मुंज यांनी दिला.
महावितरणची भूमिका
दरम्यान, अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी वीज ग्राहकांच्या समस्या ऐकून घेत पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत आणि योग्य दाबाने राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची ग्वाही दिली. आंब्रड गावातील लिंक लाईनचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून केवळ तीन वीज खांब उभारण्याचे काम बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक पातळीवर काही अडथळे येत असले तरी पोलीस बंदोबस्तात ३० ते ३१ मेदरम्यान हे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या बैठकीला जि.प. सदस्य सुदान कवठणकर, रुपेश पावसकर, पं.स. सदस्य कृष्णा धुरी, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष अवधूत शिरसाट, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, मेघनाथ धुरी, तुकाराम म्हापसेकर, भूषण सावंत, सरपंच मानसी कदम, स्वप्नील मुंज, पांडुरंग दळवी, गोविंद सावंत, महेंद्र कदम तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. परिस्थिती लक्षात घेता महावितरण कार्यालयात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.









