आसाराम नगर,यावल मधील गटारींचा प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा उपोषणास बसणार…….
रहिवाश्यांनी दिले मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदन
साकळी दिनांक २८/०५/२०२६
(प्रतिनिधी आरिफ खान )
यावल शहरातील आसाराम नगर परिसरातील गट क्रमांक ७०८ (प्लॉट नं. ४७ ते ५६) येथे गेल्या अनेक वर्षांपासून गटाराच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने रहिवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात परिसरातील नागरिकांनी यावल नगर परिषद प्रशासनाला निवेदन देत १० दिवसांच्या आत समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. अन्यथा उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनानुसार, आमदार निधीतून गटार बांधकामासाठी निधी मंजूर होऊनही पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी दुसऱ्या गटारीशी जोडणी करण्यात आलेली नाही. परिणामी सांडपाणी एकाच ठिकाणी साचत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रहिवाशांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून वारंवार पत्रव्यवहार आणि विनंत्या करूनही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. नगर परिषदेकडून केवळ टँकरद्वारे पाणी काढण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली, मात्र समस्या अद्याप कायम आहे.










