पालघर | प्रतिनिधी :
“देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली, तरी आम्हा गरिबांना अजून आधार कार्डही मिळू नये का?” असा संतप्त सवाल करत पोशेरा ग्रामपंचायतीवर श्रमजीवी संघटनेच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. भीषण उन्हात हातात झेंडे घेऊन शेकडो आदिवासी कातकरी बांधव आंदोलनात सहभागी झाले होते. अनेक माता-भगिनी आपल्या लहान मुलांना कडेवर घेऊन तासन्तास उन्हात उभ्या असल्याचे हृदयद्रावक चित्र पाहायला मिळाले.
मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी आधार कार्डसह गावातील पाणीटंचाई, ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत नळ योजनेची स्थिती, रोजगार हमी योजना आणि मागील काही वर्षांतील विकासकामांचा हिशोब प्रशासनाकडे मागितला. पोशेरा ग्रामपंचायत हद्दीतील शून्य ते सतरा वर्षे वयोगटातील तसेच अठरा वर्षांवरील मिळून सुमारे २०० आदिवासी नागरिक आधार कार्डपासून वंचित असल्याचा गंभीर मुद्दा संघटनेने उपस्थित केला.
तब्बल तीन तास संबंधित अधिकारी जागेवर अनुपस्थित राहिल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनाचा वाढता दबाव लक्षात घेऊन अखेर ग्रामसेवक मंगेश पाटील आणि स्थानिक सरपंच यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.
यावेळी वंचित १४५ नागरिकांना तातडीने आधार कार्ड मिळवून देण्याचे तसेच गावातील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला आहे.
या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष अंकुश वड, मोखाडा तालुका निरीक्षक रघुनाथ चौधरी, तालुका अध्यक्ष ईश्वर बांबरे, तालुका सहसचिव रामदास वाघ, माजी तालुकाध्यक्ष पांडू मालक, संदीप पागारी यांच्यासह अनिल वाघ, विनोद वळवी, गोकुळा वळवी आणि शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









