धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील धुता गाव ते धुता पाटी परिसरातील रस्त्यावर एमएसईबी वीज लाईनच्या कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी धुता येथील जावेद शेख यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, धुता गाव ते धुता पाटी रस्त्यालगतची शेकडो हिरवीगार झाडे कोणतीही योग्य परवानगी न घेता तसेच पर्यावरणीय नियमांचे पालन न करता तोडण्यात आली आहेत. या बेसुमार वृक्षतोडीमुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल बिघडत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या प्रमाणात झालेल्या झाडतोडीमुळे भविष्यात उष्णतेत वाढ, पावसाचे प्रमाण घटणे तसेच पर्यावरणीय असंतुलन निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पुढील झाडतोड तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच संबंधित अधिकारी, ठेकेदार व जबाबदार व्यक्तींवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई करून परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यात याव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जावेद शेख यांनी दिला आहे.








