पत्रकार कैलासराजे घरत. खारपाडा पेण. अलिबाग येथील आक्षी शिलालेख त्यातील मराठीचा पहिला पुरावा आणि आगरी बोलीचा प्राचीन वारसा
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक जडणघडणीत आणि मराठी भाषेच्या उगमात रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अलिबाग जवळील ‘आक्षी’ गावात सापडलेला १००० वर्षांहून जुना शिलालेख हा केवळ मराठी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेखांपैकी एक मानला जात नाही, तर तो आपल्या स्थानिक ‘आगरी बोलीच्या’ प्राचीनत्वाचा आणि तिच्या समृद्धीचा भक्कम पुरावा देतो.
पश्चिम किनारपट्टीवर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्याचा राजा ‘केसिदेव’ याच्या काळातील हा शिलालेख आहे. या शिलालेखातील शब्दरचना आणि आजची आगरी बोली यांचा तौलनिक अभ्यास केल्यास अंगावर काटा आणणारा इतिहास उलगडतो.
काय आहे आक्षीच्या शिलालेखात?
आक्षी येथील या शिलालेखावर देवनागरी लिपीत खालीलप्रमाणे मजकूर कोरलेला आहे:
“ॐ स्वस्ति ऱ्ही शकु संवतु ९३४ प्रधावी संवत्सरे: मार्गसिर सुध भृगुवारी भूर्ज म्हीय पसीचीम समुद्राधिपती श्री कोकणा चक्रीवर्ती श्री केसिदेव राया महाप्रधाने भइर्जू सेणुई तसू मुद्र व्यापारे सीरीपोणुई आसी त द्वाकलीं देवी बहुइचिया सेला वीया सुक्रवाराचे भोअणा घाली ९ तां पालि ९ नऊ दिधली”
अर्थ: शके ९३४ प्रभव संवत्सरात, मार्गशीर्ष शुद्ध शुक्रवारी, पश्चिम समुद्राधिपती कोकण चक्रवर्ती श्री केसिदेव राया याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याच्या मुद्रा व्यापारात देवीच्या उपासनेसाठी शुक्रवारी अन्नाची व्यवस्था केली.. आगरी बोली आणि शिलालेखातील शब्दांचे मोठे साम्य: हा शिलालेख मूळ मराठीतील पहिला शिलालेख मानला जातो, पण त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात वापरले गेलेले शब्द थेट आजच्या आगरी बोलीशी नाते सांगतात. आजही या भागात आगरी-कोळी समाजाची मोठी वस्ती आहे, आणि त्यांच्या रोजच्या बोलीभाषेत १००० वर्षांपूर्वीचे हे शब्द जिवंत आहेत. * ‘शकू’ शब्द: प्रमाण मराठीत आपण ‘शके’ असे म्हणतो (उदा. शके १९४५). मात्र, आगरी बोलीत आजही ‘शकू’ हाच शब्द वापरला जातो. शिलालेखाची सुरुवातच ‘शकु संवतु ९३४ अशी होते. महिन्यांची नावे: ‘मार्गशीर्ष’ या महिन्याला आगरी बोलीत ‘माघी’ किंवा ‘मार्गसिर’ बोलले जाते. शिलालेखात स्पष्टपणे ‘मार्गसिर’ असा उल्लेख आढळतो.
‘श’ ऐवजी ‘स’ चा वापर: आगरी बोलीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यात ‘श’ या व्यंजनाच्या जागी अनेकदा ‘स’ हे अक्षर वापरले जाते. जसे की, ‘प्रकाश’ ला परकास, ‘शुद्ध’ ला सुद म्हटले जाते. शिलालेखातही ‘शुद्ध’ ऐवजी ‘सुध’ आणि ‘शुक्रवार’ ऐवजी ‘सुक्रवारी’ असा हुबेहूब आगरी वळणाचा शब्द वापरण्यात आला आहे. इतकेच काय अलिबागमधील नागाव येथेही १३ व्या शतकातील एक शिलालेख सापडतो ज्यात ‘आगरी’ समाजाचा स्पष्ट उल्लेख आहे. आक्षीचा शिलालेख (शके ९३४) जसा आगरी बोलीच्या ‘भाषेच्या वळणाचा’ आद्य पुरावा देतो, तसाच हा नागावचा शिलालेख (शके १२८९) ‘आगरी’ समाजाच्या ऐतिहासिक अस्तित्वाचा आणि स्थानिक प्रशासनातील त्यांच्या महत्त्वाचा सर्वात मोठा आणि भक्कम लिखित पुरावा आहे. आक्षीचा हा शिलालेख आणि नागावचा पुरावा हे सिद्ध करतात की, आगरी बोली ही नक्कीच एक अतिप्राचीन बोली आहे. केवळ इतकेच नाही, तर काळानुरूप प्रमाण मराठी भाषा बदलत गेली असली, तरी आगरी बोलीने मूळ मराठीचे किंवा प्राकृत भाषेचे शुद्ध रूप अजूनही आपल्या अंगाखांद्यावर अभिमानाने टिकवून ठेवले आहे, असे म्हटल्यास ते अजिबात वावगे ठरणार नाही…सर्वेश रविंद्र तरे ( लेखक-आगरयान )










