कल्याण : कल्याण, डोंबिवली, ठाणे, टिटवाळा, बदलापूर तसेच मुंबईतील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांना गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
मात्र, पावसाच्या आगमनाबरोबरच मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. अनेक लोकल गाड्या उशिराने धावत असल्याने मुंबईकडे कामासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक प्रवाशांना कार्यालये, उद्योग-व्यवसाय आणि अन्य कामांसाठी वेळेत पोहोचणे कठीण झाले.
पहिल्याच पावसात रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा केला जातो. मात्र, काही सरी कोसळताच सेवा विस्कळीत होत असल्याने या तयारीच्या प्रभावीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
जून-जुलै महिन्यात मुसळधार पावसाचा जोर वाढल्यानंतर लोकल सेवेची काय अवस्था होणार, अशी चिंता प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून लोकल सेवा सुरळीत ठेवावी, अशी मागणी चाकरमान्यांकडून करण्यात येत आहे.



