स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतरही मोजराबारीपाडाचे आदिवासी प्राथमिक सुविधांपासून वंचित !
रस्ता, पाणी, वीज,शाळा, अंगणवाडी, दवाखान्याची बिरसा फायटर्स संघटनेकडून मागणी
तहसीलदार व गटविकास पंचायत समिती तळोदा यांना निवेदन
अक्राणी प्रतिनिधी :- भारत देशाला ७९ वर्षे पूर्ण झाली असली तरी तळोदा तालुक्यातील मोजराबारीपाडा गांवातील आदिवासी बांधव रस्ता, पाणी, वीज, शाळा, अंगणवाडी, दवाखाना या प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत. तळोदा तालुक्यातील मोजराबारीपाडा हा पाडा ग्रामपंचायत वाल्हेरी अंतर्गत येतो.मोजराबारीपाडा येथे १०८ पेक्षा अधिक कुटुंब राहत असून ४५० पेक्षा अधिक लोकसंख्या आहे. वाल्हेरी ग्रामपंचायत अंतर्गत येणारा मोजराबारी पाडा वाल्हेरी ग्रामपंचायत पासून ३ कि.मी. अंतरावर दूर आहे. लोकांना येण्या जाण्या साठी रस्ता नाही. गरोदर महिला किंवा आजारी व्यक्तींना बांबू लन्समध्ये चादर किंवा ब्लॅकेटमध्ये झोला बांधून मोजराबारी ते वाल्हेरी पर्यंत खांद्यावर घेऊन पायी पायी जावे लागते.पाणी नसल्यामुळे थेंब थेंब पाण्यासाठी आदिवासी महिलांना डोंगरदऱ्यातून वन वन भटकावे लागते.वीज नसल्यामुळे येथील रहिवासी रात्री अंधारात राहतात.
मोजराबारीपाड्यात ६० पेक्षा अधिक लहान बालके आहेत. गावात शाळा व अंगणवाडी नसल्यामुळे येथील बालकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.दवाखाना जवळपास नसल्यामुळे गरोदर महिला व रूग्णांना बांबूच्या झोळीत दवाखान्या पर्यंत न्यावे लागते.स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतरही वाल्हेरी मोजराबारीपाडा येथील आदिवासी रस्ता,पाणी, वीज, शाळा, अंगणवाडी, दवाखाना या प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत, म्हणून या गावात प्राथमिक सुविधा पोहचवा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार व गटविकास पंचायत समिती तळोदा यांच्या कडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.











