श्रीक्षेत्र चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित मुख्य जयंती सोहळा व अभिवादन सभा आज श्रीक्षेत्र चौंडी येथे अभूतपूर्व जनसहभाग, भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.
या ऐतिहासिक सोहळ्यास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदे सर, उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्राताई पवार, कृषिमंत्री मा. श्री. दत्तात्रय भरणे, माजी मंत्री मा. श्री. अण्णासाहेब डांगे, खासदार मा. श्री. रामराव वडकुते तसेच सर्व आमदार, विविध लोकप्रतिनिधी, मान्यवर, भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. श्री. जयकुमार गोरे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती मा. ना. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. तसेच श्री अहिलेश्वर मंदिरात महाअभिषेक करून दर्शन घेतले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना मी नमूद केले की, लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आणि वारशाचा गौरव करण्याचे ऐतिहासिक कार्य मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने केले आहे. अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे त्यांच्या कार्याचा गौरव अधिक व्यापक पातळीवर पोहोचला आहे.
तसेच नव्या पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंकला वीर शिंग्रोबा यांचे नाव देण्याची मागणी यावेळी केली. चौंडी ही केवळ अहिल्यादेवींची जन्मभूमी नसून बहुजनांच्या आयुष्यात परिवर्तन घडवणारी प्रेरणादायी पुण्यभूमी असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी झाली, याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याचा ऐतिहासिक निर्णय हा इतिहासाचा सन्मान करणारा असल्याचे नमूद केले. तसेच भटक्या-विमुक्त समाजावरील ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी केली. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन तो मार्गी लावावा, अशी विनंतीही यावेळी केली.
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी न्याय, धर्म, लोककल्याण, जनसेवा आणि सुशासनाचा जो आदर्श निर्माण केला, त्या महान कार्याला कृतज्ञ अभिवादन करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्र श्रीक्षेत्र चौंडी येथे नतमस्तक झाला.









