शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी शिरपूर फर्स्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेनंतर आता विविध शासकीय विभागांकडे निवेदने सादर करून प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.
२३ मे ते २८ मे दरम्यान पार पडलेल्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील २१ गावांना भेट देत ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. या भेटीत रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, वीज, सार्वजनिक वाहतूक तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी यांसारख्या अनेक प्रश्नांकडे नागरिकांनी लक्ष वेधले होते.
एसटी सेवा नियमित करण्याची मागणी
शिरपूर एसटी आगार प्रमुख Varsha Pawara यांना देण्यात आलेल्या निवेदनात शिरपूर–रुदावली मार्गावरील एसटी सेवा नियमित सुरू ठेवण्याची तसेच दिवसातून किमान दोन फेऱ्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय दूर होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठ्याची मागणी
महावितरणचे कार्यकारी अभियंता Kishor Patil यांना दिलेल्या निवेदनात शेतीपंपासाठी नियमाप्रमाणे दररोज आठ तास वीजपुरवठा मिळावा, अशी मागणी करण्यात आली. अनेक भागांत अपुरा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला. तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
स्वच्छतेच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले
पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अनेक गावांमधील अस्वच्छता, उघड्या गटारी आणि स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटींमुळे रोगराई पसरण्याचा धोका वाढल्याचे नमूद करण्यात आले. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना प्रतीकात्मक स्वरूपात च्यवनप्राश भेट देण्यात आला.
महिलांसाठी स्वतंत्र मदत कक्षाची मागणी
नायब तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात लाडकी बहीण योजना तसेच महिला कल्याणाशी संबंधित विविध योजनांसाठी येणाऱ्या महिलांना मार्गदर्शन मिळावे यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र मदत कक्ष सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
पुढील आंदोलनाचा इशारा
जनसंघर्ष यात्रेदरम्यान समोर आलेल्या सर्व प्रश्नांच्या निराकरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच आगामी काळात रेशन वितरण व्यवस्था, खत-बियाणे उपलब्धता आणि विविध शासकीय योजनांमधील त्रुटींविरोधातही व्यापक आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
निवेदन सादर करताना शिरपूर फर्स्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दहिवद, तरडी, हिंगोणी आणि परिसरातील विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.











