छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा-देवळाई परिसर हा महापालिकेला मोठ्या प्रमाणात कर (टॅक्स) भरणारा भाग मानला जात असला, तरी आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः पाणीटंचाईच्या समस्येमुळे येथील रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जानेवारी महिन्यापासून या परिसरातील बहुतांश नागरिकांना पाण्यासाठी खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत गेल्याने टँकरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. सुरुवातीला सुमारे ३०० रुपयांना मिळणारा पाण्याचा टँकर आता जवळपास दुप्पट दराने घ्यावा लागत असून, त्यासाठीही दोन दिवस अगोदर नोंदणी करावी लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतरही तातडीचा दिलासा मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरात नियमित पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी अजून किमान दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे सांगण्यात येत असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी वाढत आहे.
महापालिकेच्या टँकर सुविधेबाबतही नागरिकांनी असमाधान व्यक्त केले आहे. एक दिवसाआड केवळ २०० लिटर पाण्याचा ड्रम उपलब्ध करून दिला जात असल्याचे सांगण्यात येते. दहा जणांच्या कुटुंबासाठी किंवा एका इमारतीतील अनेक कुटुंबांसाठी हे प्रमाण अत्यंत अपुरे असल्याने ही व्यवस्था व्यवहार्य नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
पाणीटंचाईच्या वाढत्या समस्येमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
स्थानिक रहिवासी शंतनू कृष्णराव पोळ यांनी प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन सातारा-देवळाई परिसराला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.
पाणी ही मूलभूत गरज असून कर भरणाऱ्या नागरिकांना त्यासाठी संघर्ष करावा लागणे ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.






