खर्डी (ता. शहापूर) | प्रतिनिधी :
खर्डी गावातील विविध नागरी समस्यांबाबत युवा संकल्प सेनेच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. विशेषतः गावातील तलाव परिसरातील मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत संघटनेने ग्रामपंचायतीसमोर जाहीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
युवा संकल्प सेनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गावातील इतर सार्वजनिक ठिकाणी विद्युत सुविधा उपलब्ध असताना तलाव परिसरात अद्यापही वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे सायंकाळच्या वेळेस नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच तलाव परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. परिसरात कचरा पेट्यांची सुविधा नसल्याने कचरा साचत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. नियमित स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय गावातील व्यसनमुक्ती समितीही गंभीर सामाजिक प्रश्नांकडे अपेक्षित लक्ष देत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. गावातील युवक आणि नागरिकांच्या हितासाठी व्यसनमुक्तीविषयक जनजागृती व प्रतिबंधात्मक उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
तलाव परिसरात स्वच्छता, विद्युत सुविधा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात, अशी मागणी युवा संकल्प सेनेने केली आहे.
दरम्यान, या संदर्भात सरपंच व संबंधित प्रशासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळालेला नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. ग्रामस्थांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी युवा संकल्प सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.






