– यश महाजन, कला शिक्षक व जनगणना पर्यवेक्षक
भारतीय जनगणना २०२७ च्या कामानिमित्त पर्यवेक्षक म्हणून कार्य करताना मला आणि माझ्या सहा प्रगणकांच्या पथकाला विविध भागांमध्ये जाऊन माहिती संकलन करण्याची संधी मिळत आहे. या प्रक्रियेदरम्यान केवळ लोकसंख्येची आकडेवारीच नव्हे, तर समाजाचे एक वेगळे आणि विचार करायला लावणारे वास्तवही जवळून पाहता आले.
देश आज विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. ‘आत्मनिर्भर भारत’, ‘स्मार्ट सिटी’, ‘डिजिटल इंडिया’ यांसारख्या संकल्पना आधुनिक भारताचे चित्र उभे करत आहेत. मात्र या विकासाच्या झगमगाटामागे आजही समाजातील मोठा घटक मूलभूत गरजांसाठी संघर्ष करत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
जनगणनेच्या कामादरम्यान काही वस्त्या आणि वंचित भागांना भेट दिली असता अनेक कुटुंबे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगताना आढळली. काही ठिकाणी घरांची अवस्था अतिशय दयनीय असून स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभाव, सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था, परिसरातील अस्वच्छता आणि दुर्गंधी यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून आले.
सर्वात वेदनादायक बाब म्हणजे अनेक लहान मुलांकडे अंगभर कपडेही नव्हते. काही मुलांना पुरेसा पोषण आहार मिळत नसल्याचेही जाणवले. शिक्षण, आरोग्य आणि पोषण या मूलभूत हक्कांपासून अनेक बालके आजही वंचित असल्याचे चित्र दिसून आले. रोजंदारीवर काम करणारे मजूर, हातावर पोट असलेली कुटुंबे आणि उपजीविकेसाठी सातत्याने संघर्ष करणारे नागरिक यांचे जीवन पाहून मन हेलावून गेले.
विकासाचा अर्थ केवळ उंच इमारती, रुंद रस्ते किंवा आधुनिक सुविधा एवढाच नसतो. विकास तेव्हाच खरा मानला जाईल, जेव्हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचतील. प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित निवारा, स्वच्छ पाणी, आरोग्यदायी वातावरण, दर्जेदार शिक्षण आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळेल, तेव्हाच विकासाचे चित्र पूर्ण होईल.
आज गरज आहे ती शासन, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि समाजातील सर्व घटकांनी अशा भागांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची. जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून समाजातील वास्तव समजून घेण्याची आणि विकासातील तफावत ओळखण्याची महत्त्वाची संधी आहे. या वास्तवाकडे डोळसपणे पाहून आवश्यक उपाययोजना केल्या, तरच विकासाच्या घोषणा सामान्य नागरिकांच्या जीवनात प्रत्यक्ष उतरतील.
भारत महासत्ता बनण्याचे स्वप्न आपण पाहत आहोत. मात्र त्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने यश मिळेल, जेव्हा देशातील प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणि जीवनात सन्मानाची हमी असेल.
“विकासाचा खरा मापदंड शहरातील गगनचुंबी इमारती नसून समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या जीवनमानातील सुधारणा हा आहे.”







