पेण प्रतिनिधी
पेण तालुक्यातील दिव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दिव तलावातील मातीचा गाळ काढण्याचे काम सध्या वेगाने सुरू असून हे काम लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. तलावाच्या संवर्धनासाठी आणि जलसाठा क्षमता वाढविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे.
सदर काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विद्यमान सरपंच सौ. मनीषा मंगळदास ठाकूर, उपसरपंच तसेच सर्व सदस्यांच्या पुढाकाराने करण्यात येत आहे. तलावातील गाळ काढल्यामुळे पावसाळ्यात अधिक पाणी साठविणे शक्य होणार असून परिसरातील जलस्रोतांना त्याचा लाभ मिळणार आहे.
गावाच्या विकासासाठी आणि जलसंधारणाच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या या कामाबद्दल दिव ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले आहे. ग्रामस्थांच्या मते, तलावातील गाळ काढल्याने भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे.
ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे गावातील नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून विकासकामांबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.






