संभाव्य अल निनो व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
धाराशिव,दि.२ जून (जिमाका) संभाव्य अल निनो परिस्थितीमुळे उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी सार्वजनिक व खासगी विहिरी, हातपंप तसेच रिचार्ज शाफ्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर भूगर्भात पाणीसंचयन होईल अशा पद्धतीने ‘जलतारा खड्डे’ तयार करावेत.तसेच सार्वजनिक इमारतींवरून पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी भूजल पुनर्भरणासारखे उपक्रम राबवून जलस्रोत बळकट करावेत.पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करून त्याचा अपव्यय टाळावा,असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी आज मंगळवारी (दि.२ जून) त्यांच्या दालनातून संभाव्य अल निनो आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई व चारा उपलब्धतेबाबत आयोजित आढावा बैठकीत हे निर्देश दिले.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात,नगरपालिका प्रशासन विभागाचे जिल्हा सहआयुक्त त्र्यंबक ढेंगळे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ.डी.एम.मुळे,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ वैज्ञानिक आर.व्ही.मांजरमकर, धाराशिव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एन.मदने,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एम.कटकधोंड,मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी,धाराशिव पाटबंधारे विभाग क्रमांक दोन (उमरगा) चे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे,धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे,जिल्हा परिषद यांत्रिकी विभागाचे उपअभियंता एस.पी.शिंदे उपस्थित होते.तसेच सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की,पुढील वर्षीही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.त्यामुळे आतापासूनच सूक्ष्म नियोजन करून भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मोठ्या प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.सिंचन प्रकल्प परिसरातील गावांमध्ये पाण्याची पातळी समाधानकारक असल्यास विनाकारण विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करू नयेत.तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून ज्या विहिरी पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत,त्यांची प्रत्यक्ष गरज तपासावी.
ग्रामपंचायतींनी स्वतःचे जलस्रोत सक्षम करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. तसेच सिंचन प्रकल्पांतील पाणी परिसरातील गावांच्या पिण्याच्या गरजांसाठी अधिग्रहित करण्याची कार्यवाही करावी,असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी ‘जलतारा खड्डे’ हा उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविण्याचे निर्देश देत श्री.पुजार म्हणाले की,सुधारित टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात यावा. विहिरींमधील गाळ काढणे,त्यांची दुरुस्ती तसेच हातपंप दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत.शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील विहिरींजवळ व शेतात जलतारा खड्डे तयार करण्यासाठी प्रोत्साहित करावे.
सार्वजनिक आणि खासगी इमारतींवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संचयन करण्यासाठी भूजल पुनर्भरणाची कामे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन करावीत.पाणीपुरवठा योजनांमधील गळती तातडीने थांबवावी. तसेच सिमेंटच्या पोत्यांत रेती भरून नदी-नाल्यांतील वाहते पाणी अडवून त्याची भूगर्भात साठवण करण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून पुढाकार घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.
निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनीही पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी अधिग्रहित केलेल्या विहिरींची तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी तसेच शेतकऱ्यांना जलतारा खड्डे तयार करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे सांगितले.
बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एम.कटकधोंड यांनी माहिती दिली की,सध्या धाराशिव तालुक्यातील सात गावांना ११ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून ५२ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.तुळजापूर तालुक्यात नऊ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.भूम तालुक्यातील दहा गावांसाठी २२ विहिरी तसेच चार गावांसाठी पाच खासगी टँकर कार्यरत आहेत.याशिवाय १५ गावांसाठी १६ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात एकूण ११ गावांना १६ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून ६५ गावांसाठी ९९ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात यांनी सांगितले की,धाराशिव पाटबंधारे विभाग क्रमांक एक व दोन अंतर्गत एकूण २२६ प्रकल्प आहेत.त्यामध्ये एक मोठा,१७ मध्यम आणि २०८ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.या सर्व प्रकल्पांमध्ये ७२८.८० दलघमी उपयुक्त पाणीसाठा क्षमता असून २९ मे २०२६ अखेर १२०.७४२ दलघमी म्हणजेच १६.५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ.डी.एम.मुळे यांनी सांगितले की, जिल्ह्यात ७ लाख ९० हजार ३९९ इतके पशुधन असून त्यासाठी दररोज ३ हजार ८९ मे.टन वैरण आवश्यक आहे. उपलब्ध व संभाव्य वैरण साठा ४ लाख ६३ हजार ३५० मे.टन असून तो ऑक्टोबर २०२६ पर्यंत पुरेल इतका आहे.
वैरण विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून ५० हजार किलो संकरित मका बियाण्यांचे वितरण करण्यात आले असून त्यातून सुमारे २ लाख ५० हजार मे.टन चारा उत्पादन अपेक्षित आहे.तसेच विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत ५,२२० किलो संकरित मका बियाणे ५२२ पशुपालक शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले असून त्यातून २६ हजार १०० मे. टन चारा उत्पादन अपेक्षित आहे.
एकूण ५५ हजार २२० किलो संकरित मका बियाणे १३ हजार २२ पशुपालकांना वितरित करण्यात आले असून त्याची लागवड १३ हजार ८०५ एकर क्षेत्रावर करण्यात येत आहे.यामधून सुमारे २ लाख ७६ हजार १०० मे.टन चारा उत्पादन होण्याची अपेक्षा असल्याची माहिती डॉ.मुळे यांनी दिली.
बैठकीत ऑनलाइन सहभागी झालेल्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना व कामांचा आढावाही सादर केला








