देवळा | प्रतिनिधी
देवळा तालुक्यातील दहिवड येथे तहसीलदारांच्या आदेशानंतरही शेतरस्ता मोकळा करण्याच्या कारवाईला अडथळा निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी घटनास्थळी गेलेल्या मंडळ अधिकारी व तलाठी यांना दमदाटी करून कारवाई रोखण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गट क्रमांक ५१३ बं. ६ मधील जमीन ही शंकर भारती यांची वडिलोपार्जित शेतजमीन असून, गेल्या तीन वर्षांपासून त्यांना शेतात जाण्यासाठी आवश्यक असलेला वहिवाट रस्ता उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. या संदर्भात तहसीलदार, देवळा यांनी संबंधित रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईदरम्यान गणेश दत्तू देवरे, एकनाथ परशराम देवरे आणि निर्मला एकनाथ देवरे यांनी अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तहसीलदारांच्या आदेशानंतरही रस्ता मोकळा न झाल्याने शंकर भारती व त्यांच्या कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी देवळा तहसील कार्यालय तसेच देवळा पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, येत्या १५ जूनपर्यंत शेतरस्ता मोकळा करून न दिल्यास संपूर्ण कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित शेतरस्ता मोकळा करावा तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय देवळा-चांदवड मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनीही या प्रकरणात लक्ष घालून शेतकरी कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गरीब शेतकरी कुटुंबावर होत असलेला अन्याय थांबवण्यासाठी आणि रस्ता मोकळा करण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.







