दोंडाईचा | प्रतिनिधी
दादर–भुसावळ खान्देश एक्सप्रेसमध्ये ३ जून रोजी मध्यरात्री वातानुकूलित (AC) यंत्रणेत बिघाड झाल्याने आग लागल्याची गंभीर घटना घडली. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून रेल्वे प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
घटनेच्या वेळी महाराष्ट्र राज्याचे जयकुमार रावल यांच्यासह अनेक प्रवासी रेल्वेत प्रवास करत होते. तसेच गाडीत मोठ्या संख्येने महिला, वृद्ध, आजारी आणि सर्वसामान्य प्रवासी उपस्थित होते. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
प्राथमिक माहितीनुसार वातानुकूलित कोचमधील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रविण महाजन यांनी रेल्वे प्रशासनाच्या देखभाल आणि दुरुस्ती व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत, खान्देश एक्सप्रेसमधील कोच अत्यंत जर्जर अवस्थेत असल्याचा आरोप केला. ताप्ती सेक्शनवरील गाड्यांमध्ये इतर विभागांच्या तुलनेत जुने व निकृष्ट दर्जाचे कोच वापरले जात असल्याची प्रवाशांची तक्रार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रविण महाजन, माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, भाजप शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, नगरसेवक हितेंद्र महाले, कृष्णा नगराळे, जितू गिरासे, संजोग रामोळे, मनोज निकम, अक्षय चव्हाण, सुभाष धनगर, नरेंद्र कोळी, अनिकेत आव्हाड, दिनेश कर्नावट, हर्षल आव्हाड, संजय अग्रवाल आदी पदाधिकाऱ्यांनी दोंडाईचा रेल्वे स्थानकाचे मुख्य स्टेशन अधीक्षक विक्रमसिंह चौधरी यांना निवेदन सादर केले.
निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
- खान्देश एक्सप्रेसमधील सर्व जर्जर कोच तात्काळ बदलून नवीन व सुरक्षित कोच उपलब्ध करावेत.
- वातानुकूलित (AC) यंत्रणेसह सर्व तांत्रिक बाबींची उच्चस्तरीय चौकशी करावी.
- ताप्ती सेक्शनवरील सर्व गाड्यांचे विशेष सुरक्षा व तांत्रिक ऑडिट करावे.
- भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.








