ठाणे | प्रतिनिधी
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात हातभट्टीच्या विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने भिवंडीतील ग्रामीण भागात मोठी कारवाई करत लाखो रुपयांचे हातभट्टी दारू उत्पादन केंद्र उद्ध्वस्त केले आहेत.
भिवंडी तालुक्यातील कालवार, केवणी, खर्डी आणि वडूनवघर परिसरातील खाडीकिनारी सुरू असलेल्या गावठी दारू निर्मितीच्या अड्ड्यांवर धाड टाकून उत्पादनासाठी वापरले जाणारे साहित्य नष्ट करण्यात आले. याशिवाय इतर भागांतही व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली.
१ मे ते ३१ मे या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान एकूण २९ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी १९ आरोपींवर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली असून, उर्वरित १० ठिकाणी आरोपी घटनास्थळी आढळून आले नाहीत.
या मोहिमेत २२५ लिटर गावठी दारू, देशी व विदेशी मद्य, २३ हजार २०० लिटर रसायन तसेच एक वाहन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १० लाख ३६ हजार ९२० रुपये इतकी असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.
राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग आणि ठाणे विभागाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक एस. एस. खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आप्पा चव्हाण, संजय वाकचौरे, सहायक दुय्यम निरीक्षक अर्जुन कापडे तसेच जवान नारायण जानकर, गणेश पाटील, सचिन पवार, निलेश तायडे आणि स्वरुपा भोसले यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीपणे राबवली.
विषारी दारूमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी आणि अवैध मद्यनिर्मितीवर लगाम घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



