पांढरकवडा | प्रतिनिधी
पांढरकवडा शहरात ३१ मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती, तर अनेक घरांचेही नुकसान झाले. या नैसर्गिक संकटाच्या काळात नगर परिषद पांढरकवडाचे नगराध्यक्ष आतिष उर्फ सोनू बोरेले यांनी स्वतः पुढाकार घेत नागरिकांच्या मदतीसाठी मैदानात उतरून कार्य केले.
वादळानंतर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत नगराध्यक्ष बोरेले यांनी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह रात्रभर शहरातील विविध भागांत काम करत कोसळलेली झाडे हटवून रस्ते मोकळे करण्याचे काम युद्धपातळीवर केले. पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेमुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले.
याशिवाय, वादळामुळे विस्कळीत झालेला पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठीही त्यांनी संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय साधून प्रयत्न केले. त्यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
या कार्यात नगरसेवक अनिल बोरेले, रुपेश कुटकलवार, भाजप शहराध्यक्ष बंटी जुवारे, शेखर जयस्वाल, राम पेगरलावार, बापू कुकसे तसेच समस्त मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
नगराध्यक्ष आतिष (सोनू) बोरेले यांनी यावेळी सांगितले की, “मी पांढरकवडा शहराचा लोकनियुक्त प्रथम नागरिक आहे. जनतेची सेवा आणि शहराचा विकास हेच माझे कर्तव्य असून, नागरिकांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी मी सदैव तत्पर राहीन.”
त्यांच्या या कार्याची शहरातील विविध स्तरांतून प्रशंसा होत असून, संकटकाळात जनतेच्या मदतीसाठी धावून आलेल्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे कौतुक केले जात आहे.




