श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील पल्लवी बबनराव आसने आणि पायल विजय पवार या दोन होतकरू युवतींची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा गौरव सोहळा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
ग्रामीण भागातील मुलींनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पोलीस दलात निवड झाल्यामुळे माळवाडगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी कारखान्याचे व्हाइस चेअरमन बाबासाहेब आदिक, कार्यकारी संचालक संतोष देवकर, संचालक हिम्मतराव धुमाळ, भाऊसाहेब उंडे, पुंजाहरी शिंदे, आदिनाथ झुराळे, रामभाऊ कासार तसेच दोन्ही विद्यार्थिनींचे कुटुंबीय उपस्थित होते.
मान्यवरांनी दोन्ही युवतींच्या यशाबद्दल अभिनंदन करत त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील मुलींनीही मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यास कोणतेही ध्येय गाठता येते, हे पल्लवी आसने आणि पायल पवार यांनी आपल्या यशातून सिद्ध केल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.



