पालघर | प्रतिनिधी
दि. १३ मे ते २४ मे २०२६ या कालावधीत पालघर येथे आयोजित करण्यात आलेले १० दिवसीय विपश्यना ध्यान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात प्रतिनिधी संतोष गोरे यांनी सहभागी होत शिबिर पूर्ण केले.
या शिबिरामध्ये राज्यासह विविध भागांतून आलेल्या अनेक साधकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अनुभवी शिक्षकवर्ग, सेवाभावी कर्मचारी आणि व्यवस्थापन समिती यांच्या मार्गदर्शनाखाली साधकांनी विपश्यना साधनेचा लाभ घेतला. मनःशांती, आत्मपरीक्षण, संयम, सकारात्मक विचारसरणी आणि तणावमुक्त जीवनासाठी विपश्यना साधना अत्यंत उपयुक्त असल्याचे अनुभव सहभागी साधकांनी व्यक्त केले.
शिबिरादरम्यान मौन, शिस्त, नियमित ध्यानसाधना आणि आत्मनिरीक्षण या तत्त्वांचे पालन करण्यात आले. दहा दिवसांच्या या साधनेतून सहभागी साधकांना अंतर्मनातील शांतता, मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वासाचा अनुभव मिळाला. तसेच मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी या साधनेचा मोठा लाभ झाल्याचे सहभागींचे मत आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवर्ग, व्यवस्थापन समिती, सेवकवर्ग आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या निस्वार्थ सेवेमुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत सुरळीत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
शिबिरातील अनुभव आणि साधनेतून मिळालेली सकारात्मक ऊर्जा आगामी जीवनप्रवासात मार्गदर्शक ठरेल, अशी भावना सहभागी साधकांनी व्यक्त केली.











