आजरा
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देताना आजरा येथील ध्येयवेडे पर्यावरणप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते वृषाल आण्णा हुक्केरी यांनी नागरिकांना झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
“पर्यावरण दिनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतो, झाडे लावतानाचे फोटो पोस्ट केले जातात. हे निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र हा उत्साह केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता वर्षभर टिकला पाहिजे. झाड लावणे सोपे आहे, पण ते मुलासारखे जपून मोठे करणे ही खरी जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.
वर्षातील ३६५ दिवस निसर्गसेवा करणारे हुक्केरी यांनी लहानपणापासूनच पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेतला. वाढते शहरीकरण, सिमेंटची जंगले आणि वाढणारी उष्णता पाहून त्यांनी प्रशासनाला दोष देण्याऐवजी स्वतःपासून बदलाची सुरुवात केली. घरातील ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्यापासून त्यांच्या पर्यावरण चळवळीची सुरुवात झाली.
पुष्पगुच्छाऐवजी जिवंत रोपांची भेट
वृषाल हुक्केरी यांनी एक वेगळी आणि प्रेरणादायी परंपरा सुरू केली आहे. वाढदिवस, सत्कार किंवा विविध कार्यक्रमांमध्ये महागडे हार-तुरे आणि पुष्पगुच्छ देण्याऐवजी ते फळझाडे किंवा फुलझाडांची जिवंत रोपे भेट देतात. यामुळे कचरा कमी होण्यास मदत होते आणि पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागतो, असे त्यांचे मत आहे.
स्वतःच्या झाडाचे फळ खाण्याचा आनंद वेगळाच
घरासमोर फळांनी बहरलेल्या आंब्याच्या झाडाकडे पाहताना ते म्हणाले, “बाजारातून विकत आणलेल्या फळांपेक्षा स्वतः जपलेल्या झाडाचे पहिले फळ खाण्यात वेगळेच समाधान असते. आपण निसर्गाला प्रेम दिले तर तो त्याच्या कितीतरी पटीने आपल्याला परत देतो.”
पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
सध्याच्या पिढीला संदेश देताना त्यांनी प्लास्टिकचा वापर टाळणे, पाण्याची बचत करणे आणि निसर्गाबद्दल संवेदनशीलता वाढविणे हीदेखील पर्यावरणसेवाच असल्याचे सांगितले. भविष्यात लहान मुलांमध्ये निसर्गप्रेम निर्माण करण्यासाठी अधिक व्यापक उपक्रम राबविण्याचा त्यांचा मानस आहे.
“विकासाच्या नावाखाली होणारी झाडांची कत्तल थांबविणे हा एका व्यक्तीचा लढा नाही. पर्यावरण वाचवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. सामूहिक सहभागातूनच आपली वसुंधरा पुन्हा हिरवाईने नटेल,” असा संदेश त्यांनी दिला.
‘झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा’ हा संदेश देत त्यांनी पर्यावरण दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.








