अंबाजोगाई | प्रतिनिधी
राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी अंबाजोगाई-परळी मार्गावरील वरवटी येथील लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे गोशाळेला भेट देत तेथील विविध शेती व समाजोपयोगी आयुर्वेदिक उत्पादन उपक्रमांचे उद्घाटन केले. या भेटीदरम्यान त्यांनी गोशाळेच्या कार्याचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचनाही दिल्या.
वरवटी येथे ॲड. अशोक मुंडे यांनी गेल्या दशकाहून अधिक काळापासून गोसंवर्धन व गोरक्षणाच्या उद्देशाने ही गोशाळा उभी केली आहे. गोशाळेत केवळ गोसंवर्धनच नव्हे तर गोमूत्र व शेणापासून सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त उत्पादने, तसेच विविध आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधने व दैनंदिन वापरातील वस्तू तयार करण्याचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोशाळेतील उपक्रमांची माहिती घेत सेंद्रिय शेतीचा प्रसार, गोसंवर्धन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या अशा प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित केले. वाढत्या रासायनिक शेतीमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक उत्पादनांकडे वळण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या भेटीत मंत्री महोदयांसोबत माजी खासदार प्रीतम मुंडे, तसेच लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या धर्मपत्नी श्रीमती प्रज्ञाताई मुंडे उपस्थित होत्या. मुंडे परिवाराच्या वतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले.
गोशाळेचे संस्थापक ॲड. अशोक मुंडे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने सुरू केलेल्या या गोशाळेत त्यांच्या कुटुंबीयांचे आगमन होणे हा आमच्यासाठी अत्यंत भावनिक क्षण आहे. आज प्रज्ञाताई मुंडे यांच्या उपस्थितीमुळे जणू साहेब स्वतःच गोशाळेला भेट दिल्याची भावना निर्माण झाली.”
यावेळी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, स्थानिक नागरिक, गोभक्त आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोसंवर्धन, सेंद्रिय शेती आणि आयुर्वेदिक उत्पादनांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.






