वर्धा | प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ जून २०२६ रोजी जिल्हाभर नाकाबंदी आणि तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान वर्धा शहरातील इतवारा चौक येथे मार्शल पेट्रोलिंग पथकाने दोन वाहनचालकांना दारूच्या नशेत वाहन चालविताना पकडले. वाहन क्रमांक एमएच-३२ एएम-५५३३ चे चालक प्रशांत देवराव आमटे (वय ४५, समतानगर, वर्धा) यांच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण १०५.० मिग्रॅ आढळून आले. तसेच वाहन क्रमांक एमएच-३२ झेड-८९३६ चे चालक श्रीधर प्रमोद गाडेकर (वय ३२, वाटखेडा, ता. देवळी) यांच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण २३५.५ मिग्रॅ आढळले.
दोन्ही वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच त्यांच्याकडे वैध वाहन परवाना नसल्याने कलम ३(१), १८१/१७७ अंतर्गत अतिरिक्त कारवाई करण्यात आली.
याशिवाय जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांनीही विशेष तपासणी मोहीम राबवून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई केली. आर्वी, सिंदी, हिंगणघाट आणि सेवाग्राम पोलीस ठाण्यांनी प्रत्येकी एक अशा चार वाहनचालकांविरुद्ध कलम १८५ अन्वये गुन्हे दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२६ मध्ये आतापर्यंत जिल्ह्यात ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’च्या एकूण १५० केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. तसेच ४५ परवाना निलंबन प्रस्ताव पाठविण्यात आले असून हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर १,२०२ कारवाया करण्यात आल्या आहेत. अवैध प्रवासी वाहतुकीच्या ९३ प्रकरणांवरही कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने नागरिकांना दारू पिऊन वाहन चालवू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा तसेच चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
“रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा,” असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांनी केले आहे.







